मंगळवार, १२ मे, २०१५

दाऊद तुला शोधू कुठे...?
कैफ...मग तो मद्याचा असो, सत्तेचा असो वी नैतिकतेचा असो, तो केव्हाही वाईटच असतो. हा विचार सत्ताधारी, राजकीय नेते, श्रीमंत आणि अतिश्रीमंत (काही सन्माननीय अपवाद) यांना बऱ्याच अंशी लागू होतो. भाजप जाणतेपणा करीत सत्तारुढ झाला मात्र त्या पक्षाच्या नेत्यांनी जाणते-अजाणतेपणी वक्तव्यांची जी काही मुक्ताफळे उधळली यावरून सत्तेचा कैफ काय असतो, याचा अर्थ कळायचा मार्ग मोकळा होतो. हाच कैफ अर्थात माज मग आपण काय बोलतो, कुणासमोर बोलतो, आपलं काय स्थान आहे, आपण किती जबाबदार आहोत, याचे भान विसरवतो. भाजप नेत्यांमध्ये एकाने वक्तव्य केले की दुसऱ्यानेही लगेच दुसरे वक्तव्य केले पाहिजे, असा काही अलिखित नियम घालून घेतला आहे की काय , अशी शंका घ्यायला काहीच हरकत नाही. दाऊदवरून भाजपच्या नेत्यांनी जो वक्तव्यवाद घातला तो सत्ताधाऱ्यांना शोभणारा नाही. दाऊदच्या शोधाचा जो काही ऊहापोह केला जातोय त्यावरून दाऊदही स्वत:चा उदोउदो करून घेत असेल. जीभ आहे आणि तिला ३२ दातांची संरक्षक भिंत आहे म्हणून विचार न करता टाळ्याला लावता कामा नये. पण करणार काय? सत्तेपुढे शहाणपण घालीन लोटांगण करत असल्यामुळे यांच्या तोंडावर हात कोण धरणार, हा यक्ष प्रश्न आहे. राजकीय नेते असे काही अतार्किक वक्तव्य करतात आणि नंतर तोंडघशी पडतात, हा प्रश्न यक्षालाही सतावत असेल. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने दाऊदला भारतात आणू असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरल्याने भाजपपुढे अडचणी वाढल्या. त्यातच दाऊद कुठे आहे हे माहीत नसल्याचे वक्तव्य गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी केले आणि ते भाजपच्या चांगलंट अंगलट आले. त्यामुळे चौधरींच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याची पाळी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर आली. त्यामुळे टीम भाजप आता दाऊदला शोधायला बाहेर पडणार की नाही, हे काँग्रेसला पाहावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा