शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

सीमावादाची ५५ वर्षे

प्रिय मैत्रणी,
गुड मॉर्निंग, अगं ही काय आळोखे देत उठण्याची वेळ आहे का? लोक वादावादासाठी रस्त्यावर उतरलेत अन् तू एक अजून बेड टी घेतेस... आज कसला आलाय वाद असा प्रेमळ स्वरात प्रश्न विचारू नकोस... गेली ५५ वर्षे सुरू आहे वादावादी... अगं, तू हा वाद कशीकाय विसरलीस? सीमावाद म्हणतोय मी... सीमावाद असा प्रश्नार्थक प्रश्न विचारू नकोस... महाराष्ट्र-कर्नाटक वादाला पाढे पंच्चावण.. स्वारी, पुरी ५५ वर्षे झालीत... वाद आवरण्याची वेळ आलीय, पण दोन्ही राज्ये सीमावाद जोपासण्याचा कसोशीने म्हणे प्रयत्न करतायत... आता सीमावादाचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या हातात... असू दे... तोपर्यंत दरवर्षी हा सीमावाद दहशतवादासारखा डोकं वर काढणार आहे...तोडफोड, हाणामारी, जाळपोळ, काळं फासणं, रास्ता रोको या शब्दांनाही आता लाज वाटेल इतका वाद ताणला गेलाय असं नाही का तुला वाटत? एक वेळ रबर ताणला तर तुटेल पण असले वाद सुटणारही नाहीत आणि तुटणारही नाहीत... वाद सोडविण्यापेक्षा वाद कुजविण्याचं कौशल्या वादातीत आहे... वादाच्या विस्तवावर राजकारण्यांनी पोळ्या भाजण्याचंच कर्तृत्व केलंय... ज्या शिवसेनेनं सीमावादात उडी घेतली त्या शिवसेनेला संधी असतानाही सीमावाद सोडवता आला नाही.... मला काय म्हणायचंय हे तुला कळतंय ना.... तू अशी बेळगाववासिनी अन् मी असा महाराष्ट्रवासी... आपल्यात मात्र असा वाद होऊ देऊ नकोस...सीमाबांधवांना आता कोणताही पक्ष वाली राहिलेला नसला तरी मी तुझा वाली आहे... आणि म्हणून मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे... सीमाभागातील जनतेचं आयुष्य असं होरपळून निघतंय...तसं तुझं आयुष्य मी होरपळू नाही देणार...हा माझा वचननामा आहे....मला काय म्हणायचंय... मुंबईच्या फर्लांगभर असणारे वाडे, पाडे, वाड्यावस्त्या आज उपोषण, कुपोषण आणि घोटभर पाण्यासाठी घटका मोजतायंत, शेतकरी आत्महत्या करतायंत, ऊस, कांदा, कापसाचा प्रश्न आहेच पाचवीला पुजलेला... मग बेळगाववासीयांना महाराष्ट्रात घेतलं तर खरंच आपण संगोपन करू का त्यांचं, हा प्रश्न आहेच.... बघ, हे सर्व बाजूला ठेव आणि माझ्यावरच्या पूर्ण विश्वासानं तू महाराष्ट्रीय हो... तुला सांभाळण्यासाठी मी समर्थ आहे... ५५ वर्षांपर्यंत वाटेला डोळे लावून वाट बघायला लावणार नाही तुला हा माझा शब्द...
तुला सामावून घेणारा तुझाच,
प्रेयस

1 टिप्पणी:

  1. वा छान लिहिले आहे. फक्त एक सुचवावेसे वाटते की, लेखाची काळी पार्श्वभूमी बदलली तर बरे होईल. काळ्यावर पांढरे असल्याने अंगावर आल्यासारखे वाटते. बाकी लिखाण उत्तम... ही कला सकाळमध्ये असताना कधी दाखवली नाहीत...! असो.

    उत्तर द्याहटवा