प्रिय मैत्रणी,
गुड इव्हिनिंग, अगं आज म्हटलं गुड इव्हिनिंग करूया... वीकेण्ड असला की अनेक जण वीकेण्डला जाण्याचे बेत आखतात... पण तुला सांगू का, मी आता वीकेण्डला माझ्या दुस-या घरी जाण्याचं ठरवलंय... आता दुसरं घर कुठलं ही उत्सुकता लागली असेलच... असो... अशी रागावू नकोस... बरं तर माझ्या दुस-या घराचा पत्ता आहे... मुंबई, डॉक्टर आंबेडकर रोड, रंगारी बदक चाळीतील अभिज्ञान अकादमी... माझ्या या दुस-या घराचं घरपण सांभाळतायंत माझे प्रिय गुरूवर्य, मित्रवर्य प्राध्यापक विजय जामसंडेकर... अभिज्ञान अकादमी ही माणसाला प्रेमपण देणारी एकमेव संस्था आहे... काय देत नाही हे घर मला... सर्वच देतं अगदी अथपासून इथपर्यंत... मी जो काही तुझ्यासमोर आहे ना ती या घराची देणगी आहे... जो जे वांछिल ते... असं माझं हे घर... या घरानं अनेक विद्यार्थ्यांना केवळ उभंच केलं नाही तर त्यांचं आयुष्य घडवलंय... अनेकांना मरणाच्या वाटेवरून नवजीवन दिलंय... अनेकांचे उदध्वस्त संसार फुलवलेत... तर मोडणा-या संसारांना प्रेमाने, विचारांनी, जगण्याच्या दृष्टिकोनानं उभारी दिलीय... अशा माझ्या घराचा असा मोठा परिवार...रमायला आवडतं अशा या परिवारात... मनसोक्त आनंद लुटल्याचा क्षण काही औरच असतो, बघ...
माझं हे संस्थारूपी घर जगावेगळं शैक्षणिक कार्य करतंय...अगदी प्रवाहाच्या विरोधात जाऊन... आजच्या तकलादू आणि खर्चिक शिक्षणपद्धतीमुळे आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझं घर आधारवड ठरलंय... आणि अजून ठरत आहे... इतकंच नव्हे तर ते अनेकांना अगदी माझ्यासारख्यांना जणू आपलं हक्काचं दुसरं घरच वाटंत... ज्योत से ज्योत.... म्हणतात ना तेच कार्य माझं घरकुल करतंय... गेली अनेक वर्षांपासून आणि तेही अगदी मनापासून...या घरकुलानं शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील अनेकांचं जीवन प्रकाशासारखं लख्ख उजळून टाकलंय... आता तू म्हणशील हे कसं काय शक्य आहे, तुला प्रश्न पडणं साहजिकच आहे...माझं घर म्हणजे अभिज्ञान अकादमी सातत्यानं नव्या रचनावादी शिक्षणासाठी विधायक भूमिका मांडतेय... आजच्या बदलत्या जीवनमूल्यांच्या काळात पालकांना मुलांच्या जडणघडणीत जीवन-शिक्षणविषयक समुपदेशन करतेय...एवढंच नव्हे तर विविध शैक्षणिक उपक्रमांची शासन, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्था, शिक्षणप्रेमी आणि माध्यमांनी दखल घेतलीय... आहे की नाही दम... आणि हो खास गोष्ट सांगायची राहूनच गेली....कोणती असं काय विचारतेस... अकादमीने प्रकाशित केलेल्या विशेषांकांना एक नव्हे-दोन नव्हे तर तब्बल अठरा पुरस्कार प्राप्त झालेत... आहे ना अभिमानास्पद आणि गौरवास्पद गोष्ट... गोष्ट असावी तर अभिज्ञान अकादमीसारखी स्वच्छ आणि स्पष्ट...
माझ्या या अकादमीत बौद्धिक चर्चा झडतात... आधुनिक आणि वैचारिक दृष्टिकोन दिला जातो... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे जीवन घडवलं जातं.... त्यामुळे येथे पाखरांनो परत फिरा असं म्हणावं लागत नाही तर पाखरंच घरट्याकडे म्हणजे अभिज्ञान अकादमीकडे परततात...मनसोक्त बागडण्यासाठी...वैचारिक देवाण-घेवाण करण्यासाठी...मदतीचा हात पुढे करण्यासाठी...आता तूही चल माझ्याबरोबर... कारण घराला प्रेमपण देणारी माणसं घडवतंय हे माझं घरकुल...त्या घरकुलात प्रत्येकाचं स्वागतच होतं... आज तुझंही होईल तेवढ्याच प्रेमानं जेवढं माझं काही वर्षांपूर्वी झालं होतं... चलं, आता बोलण्यात वेळ घालवू नकोस...वाट पाहतंय माझं दुसरं घर...
तुझाच घरकुलवेडा,
प्रेयस
लेख छान झालाय, पण शेवटून दुसऱ्या ओळीतील 'आसुयेने' हा शब्द वाईट अर्थाने आहे. तो तेवढा बदलून टाकणे...
उत्तर द्याहटवाआपल्या सूचनेबद्दल आभारी आहे.
उत्तर द्याहटवा